Tuesday 17 May 2016

जातीभेद - कुंडीतील आणि कुंडीबाहेरील

मागे मी ब्रह्मकमळाची काही पानं लावली होती कुंडीत. म्हटलं जागा फार नाहीये, पण जगवायचा आणि वाढवायचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. लवकरच वाढूही लागलं होतं. ती छोटी छोटी पानं नंदनवनासारखी कुंडीत फुलत होती. सकाळ सकाळ उठून अगोदर त्या रोपट्यांकडे धाव असे माझी. पण काही दिवसांपूर्वी आईने ती नवीन फुललेली रोपटी उखडून फेकून दिली.  सुरवातीला लावलेली ती दोनच पानं ठेवली. सकाळ सकाळ माझं डोकं फिरलं. कारण विचारलं तर एकच ऐकायला मिळालं, "अगं ती ब्रह्मकमळाची रोपटं नव्हती. दुसरीच कोणतीतरी होती. "  हे ऐकून अजुनच तिडीक गेली डोक्यात. मी काही कृषितज्ञ वेगैरे नाहीये. त्यामुळे मीही सांगू शकत नाही की ती रोपटी ब्रह्मकमळाचीच होती की नाही... पण ती जरी नसली तरी काय फरक पडणार आहे? तेही जीवच आहेत ना... ब्रह्मकमळ लावलेल्या कुंडीत त्यांनी जन्म घेतला म्हणून काय असं मारून टाकायचं का त्यांना? मला त्यांच्याबद्दल किती जिव्हाळा होता, वेगैरे मला सांगावसं नाही वाटत. पण त्यांना असं उखडून टाकणं आणि तेही अशा कारणासाठी, हे नक्कीच मला पटलं नाही.
मुळात कसंय, आपल्याकडे दर्जे, वर्ग फार दिले जातात, सगळ्याच वस्तूंना. खालचा, वरचा, मधला... त्याच वर्गांवरून आईने ब्रह्मकमळ आणि ते वेगळंच उगवलेलं रोपटं, यात फरक केला. मग तिच्या नजरेत उच्च असलेल्या रोपट्याला जगू दिलं आणि निचाला मारून टाकलं. अर्थात काय, माणसांप्रमाणे रोपटीसुद्धा या जातीभेदाला, वर्गभेदाला बळी पडली!
आता या आमच्या घरातल्या वर्गभेदाचं काय करावं म्हणून सद्ध्या आईला रोपट्यांना हात लावण्यासही बंदी आहे..! जगातल्या वर्गभेदावरही त्यांच्याच देवाने बंदी आणली असती तर कदाचित हे घडलं नसतं, पण आाता जर तर म्हणून काही होणार नाही. स्वतःच स्वतःच्या मनातील वर्गभेदावर बंदी आणावी लागेल.