Wednesday 30 August 2017

गणपती आणि भाऊ कदम

             आमच्या परिसरातील एका इमारतीतले बौद्ध धर्मातील लोकही त्यांच्या इमारतीत गणपती बसवतात. नवरात्रीत गरबा, दांडियासुद्धा असतोच. मीही जाते तिथे खेळायला. होळी साजरी होते. बिल्डरने संपूर्ण इमारत फक्त बौद्ध बांधवांसाठी बांधलीय. त्यामुळे अर्थात सगळेच बौद्ध आहेत. मग त्यांच्यावर हिंदू धर्मीयांचा त्रास असणं, किंवा गणपती जबरदस्ती बसवला गेलाय असंही नाही. बरं इतर सर्व इमारतींत गणपती मंडळ आहेत असंही नाही. त्यामुळे हिंदू धर्माशी सांगड घालण्यासाठी किंवा इतरांत मिसफिट वाटू नये यासाठीही ते करत नाहीयेत. ते इतरांप्रमाणे मध्यमवर्गीय आहेत, किंवा आम्ही सारेच मध्यमवर्गीय आहोत. त्यांना आवडतं, म्हणून ते करतायत. इथे कोणी अडवलंही नाहीये त्यांना. उलट इतर इमारतीतले, इतर जातिधर्मातली मुलंही त्यात उत्साहाने सामील असतात. बरं बुद्ध जयंती, आंबेडकर जयंतीही आमच्याकडे दिमाखात साजरी करतात. त्याचा कोणीच त्रास करून नाही घेतला कधी. उलट सकाळ सकाळ गणपतीत जशी गाणी ऐकू येतात आणि प्रसन्न वाटतं, तसंच काहीसं आम्हालाही वाटतं. सकाळी लवकर उठून गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी त्यांचे पाहूणेही येतात, आमच्याकडे गणपतीला येतात, अगदी तसेच... आमच्या इमारतीत नसलं तरी आम्ही वर्गणी देतोच सगळ्या सणांसाठी.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, काही दिवस पाहतेय, घरी गणपती बसवला म्हणून भाऊ कदमवर फेसबुकच्या माध्यमातून प्रचंड टोकाची टीका होतेय. मी याआधी जाती धर्मावर फार लिहलं नाहीये. कारण त्यात कधी पडावसंच वाटलं नाही मला, आणि अर्थात माझ्या आडनावावरूनही नको ते वाद होतील. पण आता काही दिवसात जे दिसण्यात आलं ते भयावह आहे. भाऊ कदम हे उत्कृष्ट कलाकार आहेत, घराघरांत लोकप्रिय आहेत. आता त्यांची श्रद्धा असावी गणपतीवर, देवावर, म्हणून बसवला गणपती. हे करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. ह्यात त्यांची जात कुठे आली हा प्रश्न पडला मला सुरुवातीला. पण नंतर आकलन झालं, की जात भाऊ कदमची नव्हे तर जातीयवाद्यांची मधे आली. प्रत्येक धर्म, जात यांचा प्रचार करण्याची मानसिकता एकच असते, ती कमी होण्याची, त्याची लोकप्रियता कमी होण्याची भीती. मग त्यासाठी टोकाची भूमिका ही मंडळी घेतात. देव ह्यांचा लाडका. देवाच्या नावावर नको ते खपवतात. सनातन संस्था ही त्यातील एक आहे हे आपल्याला माहित आहेच. पण स्वतःला आंबेडकरी विचारवंत म्हणवणाऱ्यांचं काय? खरं तर त्यांना बुद्ध कळाले असते तर ती टीका केलीच नसती त्यांनी. बरं मूर्तीपूजन करणाऱ्यांवरच इतकी आगपाखड का? हिंदू धर्मीयांनी बौद्ध धर्म आचरण केलं तर योग्य ठरतं, पण बौद्धांनी मूर्तिपूजा केली तर धर्म कळला नाही असा आरोप करवा? 'आमची ती अस्मिता, तुमची ती सनातनी वृत्ती' असाच आशय निर्माण होतो यातून. व्यक्ति स्वातंत्र्य जसं मूर्तीपूजनावर बहिष्कार टाकण्यात आहे तसं ते मूर्तीपूजन करण्यातही आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.

आज भाऊ कदम लोकप्रिय आहे म्हणून त्याच्यावर इतक्या त्वेषाने टीका करतायत. तितक्याच त्वेषाने आमच्या परिसरात येऊन त्या बौद्ध बांधवांचा विरोध करतील का? नाही ते शक्य नाही. कारण त्यामुळे प्रसिद्धी तर मिळणार नाहीच, उलट 'आपल्यापैकी' म्हणून जी माणसं आहेत, तीही तुटतील. कोणत्याही जातीधर्माला माणसं एवढी उपयोगी असतील तर ती त्यांना आलेल्या शहाणपणातून उभी करावी, तेव्हा त्या जातिधर्माला अर्थ आहे. माथी भडकवून, ब्रेन वॉश करून फक्त दहशतवादी निर्माण होतात, मानवतावादी नाही.

Sunday 27 August 2017

स्व

'माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्लिज हसू नकोस. हा prank नाहिये, किंवा तू केलेल्या prankचा revenge पण नाहिये. मी खरंच सांगतेय. I really like you. खूप विचित्र आहे हे माहितेय मला...'

मी हसल्यावर तिला रडू आवरेना झालं.

'मीही खरंच असा विचार केला नव्हता कधी.. पण..'

आता मला ते ऐकवेना. ती प्रचंड दीनवाण्या चेहर्याने बघत बोलतच होती. रडतच होती. काही काही ऐकू आलं नाही मला... डोळ्यांत तिचे अश्रू आणि भुरकट दिसणारी ती... केशरी ड्रेस आणि पिवळी ओढणी.. अगदी डोळ्यांत बसणारे रंग.. डोळ्यांत बसणारी ती... तेवढ्यात कोणीतरी students' room चा दरवाजा वाजवला. तोच काय तो कानात शिरला अन् मी भानावर आले. तिच्याकडे न बघताच बाहेर निघाले. चालताना पाय भासत नव्हते... जणू चालूच नये... थांबून राहावं काही क्षण... पण तरी मी चालत राहिले.. पाय आपोआप गच्चीकडे गेले.. सवय असते कदाचित मेंदूलाही.. हृदय कुठेही असो, मेंदू भानावर असतो, आपल्याला योग्य ठिकाणी पोहचवण्याचं कामच असतं त्याचं.

गच्चीवर आले मनात प्रश्नांचं ओझं घेऊन... तिला आठवून... ती.. साधी सरळ वगैरे. बीएमएम मधली अभ्यासु मुलगी वगैरे. कॉलेज फेस्टीवलच्या तयारीसाठी याच वर्षी creativeला आलेली. मीच इंटरव्ह्यु घेतलेला. विचार आलेला, दोन वर्ष आधीच आली असती तर कॉलेजचं नाव काढलं असतं, एवढी चांगली कला आहे पोरीच्या हातात. पण या वर्षी आली तेच खूप होतं. घरी ओरडा खाऊन सुद्धा रात्रीपर्यंत थांबायची. आमच्यात तीच एकटी सकाळी लेक्चरला बसून यायची, इथेच गच्चीवर. माझ्याच वर्गात होती तशी. पण मी काही फार वर्गात गेले नाही. First yearला सुरुवातीला गेले. तेव्हाच मित्रांसोबत मिळून prank केलेला. तिला प्रपोज करून किस करण्याचा तो prank होता. अर्थात किस नाही केला, पण त्याबदल्यात जोरात कानफटात खाल्लेली. कोणत्याही मुलीला त्या prankचा राग नक्कीच येणार. म्हणून मीही तिच्या त्या reaction ला फार मनावर घेतलं नाही. त्या prank नंतर खरं तर मला टॉम बॉयचा टॅग लागला. भले माझे तेव्हा दोन चार मुलांसोबत अफेअर्स सुद्धा झाले. पण तरीही माझे तोकडे केस, मुलांसोबत राहणं, त्यांच्यासोबत दारु सिगरेट पिणं, फुटबॉल, बास्केटबॉल खेळणं यामुळे कॉलेजमध्ये मी टॉम बॉयच राहिले. मुलांसाठी आणि मुलींसाठीही. काही मैत्रिणी तर मस्करीत मलाच त्यांचा बॉयफ्रेंड म्हणवून घ्यायच्या. मीही मस्करीत त्यांना seduce वगैरे करायचे. कॉलेजमध्ये आतापर्यंत जे होत आलं ते सारं काही मस्करीतच. हवे तेवढे मित्र, हवे तेवढे बॉयफ्रेंड्स, हवा तेवढा सेक्स. पण फक्त मुलांसारखी राहते, मुलांसोबत राहते म्हणून मी मुलींना आवडावे, मुलींनी माझ्यावर प्रेम करावं, इतकी मी केव्हा पुरषाळले तेच कळत नाहीये. मी कधीच मुलींना आकर्षणाने पाहिलं नाही. एखादीवर तशी नजरही फिरवली  नाही. ती सोबत असतानाही कधीच तशी बॉंडिंग केली नाही. मग तिला गैरसमज तरी कसा होऊ शकतो? मला कधीच मी स्त्री असल्याचा गौरव वगैरे नव्हता, किंवा असला तर तो बोलून किंवा चेहरा रंगवून दाखवला नाही. तशी गरजच वाटली नाही कधी. मला केस फार मोठे आवडत नाहीत, दागिने आवडत नाहीत, कुर्ता पायजमा आवडत नाही. पण शेवटचं वर्ष म्हणून साडी डे ला आवर्जून साडी नेसली होती, तेव्हा सगळे 'मुलगी वाटतेयंस' असं म्हणून मोकळे झाले. काही आनंदानं, काही दुःखाने, काही चिडवायलाच म्हणून. मला तीन वर्षांपासून ह्याची सवय झालीय. काही फरक पाडून घेताच येत नाही. पण तिला मी स्त्री आहे, मला तिच्यासारखंच स्त्रीलिंग आहे आणि मला पुरुषांचंच आकर्षण आहे हे सिद्ध का करावं मी? मी स्त्री असण्याचा पुरावा द्यावा लागत असेल तर काय अर्थ आहे माझ्या स्वपणला?

Friday 25 August 2017

डायरीतल्या गोष्टी #4

चाळीत असताना गणपती आजी-आजोबांकडे असायचा. अनंत चतुर्दशी पर्यंत. खुप लहान होते तेव्हा. त्यामुळे आठवणी फार पुसटशा आहेत. दहा दिवस चालणारे कार्यक्रम खुप आवडायचे. आरती, पाहुणे, मस्त जेवण... पत्ते खेळता येत नव्हते, कारण अर्थात कच्चा लिंबूच होते. पण भावांना फक्त पत्ते खेळताना पाहण्यासाठी मीही रात्री जागवल्याचं आठवतंय. त्रयोदशीचा कार्यक्रम तर भलताच आवडीचा होता. दुपारी कसली तरी पूजा असायची, त्यामुळे पाहुणे नेहमीपेक्षा जास्तच. संध्याकाळी बायकापोरी नऊवारी साडी नेसून, पोरं टोपी-रुमाल बांधून आत्याने शिकवलेल्या गाण्यांवर नाचायचो. मी फारच लहान असल्याने माझ्या मापाची नऊवारी तेव्हा मिळाली नसावी कदाचित. म्हणून मलाही रुमाल बांधून, टीशर्ट घालून, मिशी रंगवेलेली. एकदाच मला मी नऊवारी नेसल्याचं आठवतंय त्या कार्यक्रमात. भारी असायचा तो दिवस. आम्हाला तसंही नाचायची संधीच हवी असायची. सगळी आगरी गाणी आणि त्यांच्या स्टेप्स तोंडपाठ. पण सगळ्यांचं आवडतं गाणं 'गण बाय मोगरा'.. अगदी loop वर असायचं ते गाणं. आजीच्या घरासमोरच्या मिळेल त्या जागेत गोल करून त्या आवडत्या 'गण बाय मोगरा'च्या स्टेपवर थकेपर्यंत नाचायचो. त्यात आजीचा सहभाग आजही विशेष असतो. एवढं काय ते माझं मला आठवतंय. पण मागे एक भारी गोष्ट बहिणीने सांगितली. गणपतीच्या मखराची सजावट म्हणजे वेगळीच होती आमची. कुटूंबच तसं जुगाडू म्हणून ओळखलं जातं, त्यामुळेच असावं कदाचित. तर गणपतीच्या समोर तिन्ही बाजुला समुद्रावरची वाळू आणून पसरवत. अन् त्यात गणपती बसायच्या आधी मेथी पेरत. अनंत चतुर्दशीपर्यंत त्यात मेथी उगवायची सुद्धा. मग त्या दिवशी त्याच मेथीची भाजी असायची ताटात. किती भारीय हे... आता थर्मोकॉल आणि प्लॅस्टिकच्या वेलींची वगैरे सजावट होते. पण बाप्पाच्या पुढ्यात उगवलेल्या भाजीची चव निराळीच. अक्कल नसताना का असेना, मी ती चव घेतली हेच खुप आहे माझ्यासाठी.

Monday 7 August 2017

राखी

     दरवर्षीसारखी आजची राखीपौर्णिमा जराशी वेगळी होती. यावेळी ती आईसोबत राखी आणायला बाजारात गेली नव्हती. बहिणींसोबत गेलं की आपल्याला नेहमीच सगळ्यात वाईट राखी मिळते असं तिला वाटायचं. तसं होतंही. बहिणी आपापल्या आवडीच्या राख्या उचलायच्या. आणि आई घेईल ती राखी तिला बांधायला लागायची. म्हणून यावर्षी तिने ठरवलं, आपणच राखी घ्यायची. यंदाच मोठ्या कॉलेजात जायला लागल्याने कॉलेजचा आणि त्या परिसराचा टेंभाही मिरवायचा होताच. म्हणून तिने कॉलेजजवळच्या बाजारात जाऊन सुंदर राखी खरेदी केली. आवडता रंग, त्यावर खोट्याच सही, पण मोत्यांची सजावट, लोकरीतच केलेली नक्षी... प्रवासासाठी मिळालेल्या पैशांत तिने ती राखी खरेदी केली. पहिल्यांदाच आपल्या आवडीची राखी मिळाल्याने तिला धावत्या ट्रेनमध्येही आभाळात गेल्यासारखं वाटत होतं. बॅग उघडून सतत नजरेत ठेवत होती तिला.., मग भावाला ती बांधल्यावर काय करणार होती कुणास ठाऊक.

     सकाळ झाली. तिने गणपतीत घालायला घेतलेला पंजाबी ड्रेस आजच घातला. त्यावर आईचा आणि बहिणीचा ओरडाही नाश्ट्यासकट खाल्ला. बहिणींनी पाटाभोवती रांगोळी काढून, ओवाळणीचं ताट सजवून घरपण आणलं. दादाही नवीन कपडे घालून तयार झाला. पाटावर बसल्यावर आई, बाबा, बहिणी, सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. ती सर्वांत लहान म्हणून तिचा ओवाळणीचा नंबरही नेहमीप्रमाणे शेवटचाच. मोठ्या बहिणीने ओवाळलं, राखी बांघली, पेढा खाऊ घातला, दादा पाया पडला. दुसरीने ओवाळलं, राखी बांघली, आणि पेढा खात खात दादा पाटावरून उठून, 'झालं' म्हणून निघून गेला. ती बघतच राहिली. खुप प्रश्न होते डोळ्यांत. पण ओठांतून शब्द फुटले नाहीत. फुटणारही नव्हते. काय विचारणार होती ती? एका पुरुषावर प्रेम केलं म्हणून दुसरा पुरुष राखी न बांधता निघून का जातो, हे विचारणार होती? कि, एका पुरुषाच्या राखीसाठी दुसर्‍या पुरुषाचं प्रेम का त्यगावं, हे विचारणार होती? तिच्या आयुष्यात तीनच पुरुष होते. दादा, बाबा आणि मित्र. त्यातले दोन आता वजा झाले होते. ती तिघांशीही प्रमाणिक होती. परिस्थीती तेवढी कपटाने वागली.

     त्या दोन पुरुषांसारखंच व्यक्तिमत्व, त्यांचा रुबाब, स्वाभिमान, बंडखोर वृत्ती घेऊन तिने तिसर्‍यावर प्रेम केलं. त्या दोघांच्या वृत्तीहून एकच काय ती वेगळी गोष्ट केली होती तिने. मित्रावर प्रेम. त्याला मग स्वाभिमान आणि बंडखोरीची जोड लाभली. ना आर्जव केला, ना प्रतारणा. ते स्वभावात बसतच नव्हतं कुणाच्याच. ती वाहत होती, तशीच वाहत गेली. पण प्रवाह तिचा तिने ठरवलेला... आता दरवर्षी तिला आठवते ती राखी. तिच्या आवडीने घेतलेली. पण कोणत्याच हातावर न बांधलेली. म्हटलं तर कमनशिबी, म्हटलं तर सर्वांत सुखी. निदान तिच्या आयुष्यात तरी दोन जीवांना बंधनात, एकमेकांच्या रक्षणार्थ वगैरे अडकवण्याचा त्रास नाही आला.