Friday 18 September 2015

चिडचिड

  "ए आई काय गं आज पण खिचडी भात. रोज रोज काय खिचडी भात खायला लावते गं."
  "पापड तळले आहेत ना"
  "म्हणून काय झालं, सारखं सारखं खिचडी भात खाऊन कंटाळा आलाय. एकतर शेजवान चटणी पण नाये."
  "मग आता जा आण दुकानातून"
  "मी नाय जाणार आता.. राहुदे.. एकतर भुक लागलीय एवढी आणि खिचडी भात खायला लागतोय. एकतर दुपारी पण काय ती भाजी होती. मला आवडत नाही तेच बनवते तु नेहमी."
  "बरं मग जा आण ना काहीतरी खायला."
  "नको काय, राहुदे. बघेन माझं मी."
  प्रत्येक घरात हे conversation तसं नेहमीचंच आहे. आणि सगळ्यांची फेवरेट वांग्याची भाजी असली की बातच काही और... आजकाल मनासारखं काही झालं नाही की डोकं फुटतं. TV चालत नाही, फोडला रिमोट.. इंटरनेट स्लो चालतंय, फोडला मोबाईल.. इंटरनेटमुळे आपलं जग फास्ट आणि इझी झालं असलं तरी आपल्याला हे कळतच नाही की ह्याच इंटरनेटमुळे आपली चिडचिड होतेय. कारण झालंय असं की ज्या स्पीडने आपलं इंटरनेट चालतं तो स्पीड माणसाला आला नाहीये. इंटरनेटमुळे हवं ते आणि हवं तसं सगऴं एका क्लिकवर मिळतं आणि नेमकं तसंच बाहेरच्या जगाकडूनही आपण expect करायला लागलोय.
  आजच्या 4G च्या युगात इंटरनेट सोडून देणं शक्य नाही, पण निदान त्यावर कंट्रोल तरी असायला हवा ना. आजुबाजुला काय चाललंय हे थोडफार इंटरनेटशिवाय माहीत करुन घेण्याचा प्रयत्न करायला हवाच ना. बरं ते नाही तर निदान घरात काय चाललंय हे तर पाहु शकतो. घरातल्यांशी इंटरनेट चॅट सोडून थोडी प्रॅक्टीकल चिट चॅट सुद्धा करायला हवी.
  कुठेतरी वाचलं होतं, जेव्हा आपण एखाद्या साॅफ्ट वे ची अपेक्षा न करता स्वत: स्वत:चे मार्ग शोधतो तेव्हा आपण खरे Mature होतो. मग ही Maturity नुसती Sarcasm वर वापरण्यापेक्षा इंटरनेटवर कंट्रोल आणायला आणि चिडचिड कमी करायला सुद्धा वापरायला हवीच की.
  त्यामुळे आता आईने कारल्याची भाजी जरी बनवली तरी मुकाट्याने खायची. आणि नाहीच जमलं तर त्यासोबत टोमॅटो साॅस घ्या, काहीतरी क्रीएटीव्ह केल्याचा तुम्हालाही आनंद आणि भाजी सगळी संपवली म्हणूल आईही खुश. ( आणि आज मी कारल्याची भाजी खाणार आहे. :-P )

Tuesday 15 September 2015

पहिली पोस्ट

 कुठेतरी ऐकलं होतं की ब्लाॅग म्हणजे खरं तर आॅनलाईन डायरी आहे ज्यात आपण मनाचं, आवडणारं, न आवडणारं, सगळं काही शब्दात मांडू शकतो.
 मी डायर्या खुप लिहल्या आहेत, ज्यात छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी ब्रेक-अप अाणि भांडणांपर्यंत सगळं काही लिहलंय. मग ही डायरी लिहण्यात एवढा कसला विचार करावा मी? मनाला वाटतं ते लिहत सुटावं असं मला वाटायचं, मग हे ब्लाॅग का जमत नाहीये मला? 
ब्लाॅगला पब्लिक आॅनलाइन डायरी म्हणायला हवं, कारण डायरी ही दुसर्यांना वाचायला नाही तर आपल्या मनाचं ओझं कमी करण्यासाठी असते. पण झालंय असं की माझी ही डायरी अख्खं जग वाचणार आहे म्हणून कदाचित मला भिती वाटतेय. जसं कोणतीतरी नवीन स्टाईल केल्यावर लोक आपल्याकडे बघतील या विचारात आपण असतो, अगदी तसंच आता मला ही पोस्ट शेअर करताना वाटतंय. कारण पब्लिकली काही करायचं म्हटलं तर विचार हा करावाच लागतो. हल्ली तर गर्दीत चालण्याचेही धडे घ्यावे लागतात, मग हे सोशल नेटवर्कींग तर अजुनच डेंजर आहे, मग ते डायरी असो वा प्रोफेशनल मेल, सगळंच सोफॅस्टीकेटेड झालंय.
 असो, तर मला कळत नाहीये की मी नक्की काय लिहू ह्या पब्लिक डायरीमध्ये? माझे अनुभव की लोकांचे आवडलेले किस्से? राजकारण की माझे रोल माॅडेल? शाळेत लिहतात तसे निबंध लिहू की काॅलेजमध्ये डिबेट होण्यासारखे संस्कृती आणि संस्कारांचे विषय घेऊ?
 लोकांसोबत बोलायचं झालं तर कितीतरी विषय चर्चा करायला मिळतात. पण तेच एकपात्री स्पर्धेसारखं एकट्यानेच बडबडणं म्हणजे फारच अवघड. आणि त्यात हे आॅनलाईन बडबडणं म्हणजे फेरीवाल्याचं "रद्दी पेपर भंगार" ओरडण्यासारखं आहे, ऐकतील तेवढे  जागे लोकच  दाद देतात.
 असो, तर काय लिहु यावर बोलता बोलता बरंच काही लिहलं, तर आता ही झाली माझी पहिली पोस्ट...