Friday 2 June 2017

स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं दाखवायचं वाकून

स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं दाखवायचं वाकून...

सध्या सरकार हेच करतंय. नाही मुळात त्यांना सरकार म्हणणंच चुकीचंय. हे अजूनही अभ्यास करणारे आमदार आणि खासदरच वाटतात. मंत्रिपद वगैरे झेपणारे हे लोक नाहीत. हे भारतीय जनता पक्षाचे नुसते राजकारणी आहेत. म्हणजे एकीकडे चर्चा करूनही त्यातून काहीच फळ काढत नाहीत. आणि उलट संप केल्यावर शेतकाऱ्यांविरुद्ध भडकवायचा प्रयत्न. त्यांचा मतदार आहे शहरी आणि निमशहरी. सोशल मिडियावर ह्यांना जास्त विश्वास. आणि ब्रॉडकास्ट मीडिया तर 3 वर्षांपूर्वीच विकला गेलाय. त्याला टी आर पी महत्वाचा. या दोन्ही भक्तांना जे दिसेल ते दाखवायची सवय. डोकं लावायचं ह्यांचं काम नाही.

कोणती आई आपल्या प्रेमाने वाढवलेल्या मुलाला मारेल? बरं त्यांनी टाकला भाजीपाला रस्त्यावर. कोणाचा होता? त्यांचाच ना? तुम्ही काही इन्वेस्ट केलेलं का त्यात? नाही ना. निदान त्यांनी स्वतःची मालमत्ता टाकली रस्त्यावर. इतरांसारखं सामाजिक मालमत्तेचं नुकसान नाही केलं. दंगल नाही घडवली.

या शहरी भक्तांना भाजपची एक भावनिक शब्दखेळीच पुरेशी होते, हे नेहमीच दिसत आलंय. कोणत्याही मुद्द्याला भावनिक हात घालून मुद्दा बाजूला सारून स्वतःकडे कॅमेरे वळवायचे. ह्यावेळी शेतकऱ्यांची बाजूच ह्यांनी हिरावली. तसंही आपल्याकडे आत्महत्त्या वगैरे होतच असतात. शेतकऱ्यांचं नुकसान झालं यापेक्षा शेतकऱ्यांनी नुकसान केलं हा विषय वेगळा वाटला आमच्या लोकशाहीच्या एका आधारस्तंभाला आणि कांदे 10 चे 12 रुपये किलो झाले म्हणून रडणाऱ्या जनतेलासुद्धा.

पंधरा वर्षांत तसं बरंच राजकारण शिकलेत ते. मराठा मोर्चा दाबण्यासाठीच काय ते जलपूजन केलं, उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून चिथवलं. एका कधी बनेल न बनणाऱ्या पुतळ्यासाठी ते मोर्चातले सो कॉल्ड शिवभक्त नमलेसुद्धा हे विशेष.

असो. कर्जमाफी हवीच, पण हक्काचा हमीभाव हा मिळायलाच हवा. आणि याला पाठिंबा देता येत नसेल तर त्यांना विरोध देखील करू नका. आणि हो, कांदे 12 चे 10 वर कधी येतील याची वाट बघा.