Monday 10 December 2018

सुवर्णदुर्ग : समृद्ध इतिहास आणि वर्तमानातील अवस्था


हर्णै बंदरावर गेल्यावर एका ठिकाणी एक बोर्ड वाचायला मिळतो. वीर कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातील किल्ले सुवर्णदुर्गची सफर. सोबत डॉल्फिन व समुद्र सफर असं काहीतरी. तुम्ही दहा लोकांचा ग्रुप होईपर्यंत तिथे थांबता, बोट सुरु होते आणि तुम्ही डॉल्फिनचं अर्धमुर्ध डोकं पाहत, सुवर्णदुर्गापाशी पोहोचता. महादरवाजापासून गवताची चाहूल लागते ती आत ५ फूट उंचीच्या गवतापर्यंत मजल जाते. प्रत्येक वास्तूला घेरलेलं गवत आणि झाडं. तटबंदी व बुरुजाच्या प्रत्येक दगडावर या झाडांची दहशत आणि किल्ल्यावर बंदरावरल्या माणसांची दहशत.

सुवर्णदुर्गचा महादरवाजा


१६६० मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा किल्ला. यावर अनेक गोड्या पाण्याचे तळे आहेत, विहीर आहे, तटबंदीभोवती खंदकं आहेत, धान्य कोठार, चोर दरवाजा आणि बरंच काही आहे. एक जलदुर्ग म्हणून सर्वतोपरी मजबूत किल्ला आहे. पण हे सगळं पाहायला आपण तटबंदीवरून खाली उतरू शकत नाहीत, ना पूर्ण किल्ला धड पाहू शकत. याची दोन मुख्य कारणे – एकतर प्रचंड गवत आणि दुसरं म्हणजे नावाड्याने किल्ला पाहायला दिलेली ३० मिनिटे! ३० मिनिटांत ८ एकरचा हा विस्तृत किल्ला पाहायचा. ३० मिनिटांत एरवी आमच्या लग्नाचे फेरे घेऊन होत नाहीत, आणि ३० मिनिटांत आम्ही किल्ला फिरून यायचा. बरं ही सवय काही आपसूक लागली नाही. लोक अर्धा फेरा मारून किल्ल्याच्या बाहेरही पडतात. का? तर बघायला काही नाही. आणि बघायला का नाही? तर संपूर्ण किल्ल्यावर झाडं आणि गवत वाढलंय. एकही वास्तू नीट पाहता येत नाही. आणि वास्तू दिसली नाही की अर्थात आमचे शिवभक्त कंटाळून डॉल्फिन बघायला बाहेर येतात.


सुवर्णदुर्गावरील अवशेष


हीच अवस्था समोरच्या कणकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ल्यांची आहे. गोवा किल्ला त्यातल्या त्यात तग धरून आहे. पण कणकदुर्ग आणि फत्तेगड मधला कणकदुर्ग कोणता आणि फत्तेगड कोणता हेसुद्धा कळत नाही. तिथल्या पायऱ्यांवर गोधड्या आणि मासे सुकत घातलेले आणि पाण्याच्या टाक्या नेहमीप्रमाणे गाळ आणि शेवाळाने भरलेल्या. एखाद दुसरी तटबंदीची भिंत सोडली तर तिथे काहीच नाही. जिथे बीएसएनएलचं टॉवर लावण्यासाठी एखाद्या नेत्याचे आभार मानणारं पोस्टर लावलं जातं, पण रस्त्यांची अवस्था बेकार असते, त्या ठिकाणी अजून काय अपेक्षित असावं?


गोवा किल्ला


एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे संरक्षण तेव्हाच होते जेव्हा स्थानिक लोकांना त्या किल्ल्याबद्दल, त्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत काहीतरी आपुलकी, आदर असतो. इथे ते काहीच दिसत नाही. हर्णैमध्ये साधारण मच्छीमारांचीच वस्ती आहे. त्यांचा रोजगार मच्छीमारीवरच जास्त असतो. पण ज्या समुद्रातून आपला उदरनिर्वाह होतो त्या समुद्रातला आपलाच इतिहास ते पूर्णपणे विसरलेले दिसतात. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या होड्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर फेरीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही आपली वेळ त्यांच्याच हातात. मी इथे प्रशासनाला जबाबदार ठरवत नाही असं नाही. पण प्रशासनही माणसंच चालवत आहेत. पृथ्वीवर सध्या माणसाच्या इच्छेनुसारच बरंच काही सुरु आहे. त्यामुळे किल्ल्याची अवस्था वाळीत टाकलेल्या वाड्यासारखी झालेली पाहताना दोष फक्त आणि फक्त माणसांना द्यावासा वाटतो.

एकेकाळी सोन्यासारखी समृद्धी पाहिलेला सुवर्णदुर्ग आज दगडांचं एक बेट उरला आहे, ज्याची अवस्था पाहायला लोक जय शिवराय म्हणत येतात अन् फक्त गवतातले दगड पाहून जातात. इथे ना इतिहास उरलाय, ना आता वर्तमान. उरलाय तो फक्त निसर्गाचा नियम – जिथे पाणी, तिथे जीव.

Saturday 2 June 2018

भाग्य - हजार राम मंदिराचं



हंपी म्हणजे देवालयांची, मंदिरांची, खऱ्या अर्थाने देवभूमी! ठिकठिकाणी लहान-मोठी देवालयांच्या, तिथल्या संस्कृतीची कथा सांगणाऱ्या शिल्पांनी परिपूर्ण देवालयं, असंख्य मंदिरं. अशा या समृद्ध शहराच्या मध्यभागी, जणू हंपीचं हृदय असल्यागत अजुनही धडधडत आहे, हजार राम मंदिर. शब्दशः श्रीरामांची हजार शिल्पचित्रे असल्यासारखं भासवणारं हे मंदिर. विजयनगर साम्राज्याची राजा दुसरा देवराय याने पंधराव्या शतकात हे मंदिर उभारलं. असं म्हणतात, राज कुटूंबाचं हे मंदिर होतं. तसं पाहायला गेलं तर हे मंदिर राजवाड्यापासून काही अंतरावरच आहे. आणि ते पाहून मान्य करणंही भाग आहे. हंपीतल्या इतर देवालयांपेक्षा लहान असलं तरी या हजार राम मंदिरात प्रचंड कला कौशल्य पाहायला मिळते, आणि त्यावर कारागिरांचे अतोनात कष्टही राजकुटूंबाच्या या मंदिराला शोभेसेच आहेत.

मंदिरात प्रवेश करण्याआधीच त्यात दडलेल्या, प्रगत साम्राज्याची ग्वाही मिळते. मंदिराच्या कंपाऊंडच्या भिंतींवर अतिशय रेखीव चित्रे कोरली आहेत. ही चित्रे अखंड भिंतींवर आहेत, हे विशेष. यात तत्कालीन संस्कृती, सामाजिक व वैचारिक बूद्धी लक्षात येते हे आपल्याला माहित आहेच. हे सारं आपल्याला त्यांची वेशभूषा, केशभूषा, शिल्पांत मांडलेल्या घटना व कथांवरून कळतं. या साऱ्यांचे अर्थ काढत, अंदाज बांधत मी हंपीत एक-एक चित्र पाहत होते. पण इथे, हजार राम मंदिरातल्या या कंपाऊंडच्या भिंतींवरील चित्रे पाहून काही वेळ अगदी अवाक् झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवर संपूर्ण स्त्रियांची शिल्पचित्रे कोरली होती. त्यात तसं आश्चर्यचकित वगैरे होण्यासारखं काही नाही. कारण भारतात बऱ्याच ठिकाणी नृत्यांगनांची शिल्पचित्रे पाहायला मिळतात. स्त्रियांचा कला व संगीत क्षेत्रातील सहभाग मोठ्या प्रमाणावर शिल्पचित्रांत आणि अनेक पुरातन माध्यमांत दिसून येतो. पण इथे अखंड भिंतीवर स्त्रियांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील सहभाग पाहायला मिळतो. त्यातही तलवारी, भाले, धनुष्यबाण घेऊन लढाईसाठी सज्ज असलेल्या स्त्रिया विशेष आहेत. इतकंच नव्हे, तर घोडेस्वारी करणाऱ्या, हत्तीवर कुशलतेने स्वार स्त्रियाही विलक्षण आहेत. पुरुषी मानली जाणारी हत्यारं हातात बाळगून लढणारी ही स्त्री शिल्पे पाहून अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कारण हत्यारं हातात घेऊन लढण्याची ताकद आणि कर्तुत्व फक्त पुरुषांमध्ये आहे असे विचार रुजलेल्या देशात पंधराव्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील हंपीसारख्या शहरात असे शिल्प दिसणे म्हणजे आश्चर्यासोबतच अभिमानाची बाब आहे. स्त्रियांचं असं सर्वव्यापी असणंही, तेही पंधराव्या शतकात, जेव्हा परकीय राजवट व इस्लाम आणि मनुस्मृतीचे सावट अवघ्या देशावर होते, तेव्हा या हंपीतील चित्रांची निर्मिती नक्कीच गौरवपूर्ण आहे.




स्त्रियांच्या युद्धातील सहभागासोबतच, त्यांच्या कलेतील सहभागाचेही दर्शन घडते. नृत्य, संगीत, अशा कलांमध्येही त्या निपुण होत्या हे आपल्याला इतर शिल्पांतूनही पाहायाला मिळाले आहेच. पण बासरी, डफली यांसारखे पुरुषी म्हणवले गेलेले वाद्य स्त्रिया अगदी सहज हाताळत असल्याचं दिसतं. मला यात प्रचंड आवडलेलं, बासरी वाजवत, कृष्णाच्या मधुरधूनेत तल्लीन झालेल्या स्त्रीचं सुंदर चित्र. तिचे बंद डोळे, हात आणि पायांची ठेवण आणि विशेषतः संपूर्ण शरीरात दाटून आलेला रोमांच ते चित्र पाहताना प्रखरतेने जाणवतो. एक नृत्यांगनाही अशीच मोहक आहे. तिच्याही नृत्यात मग्नतेची, समर्पणाची भावना दिसते आहे. खरंच, दगडात कोरलेली भावनाचित्रे आहेत ही.




मला अजुन एक आवडलेलं सुंदर चित्र मंदिराच्या भिंतीवर बाहेरील बाजूला, ते म्हणजे बाळकृष्णाचं गोंडस चित्र. खालील दोन्ही चित्रे इतकी सुरेख आहेत की खरंच कृष्ण लहान असताना असाच गोंडस आणि खट्याळ असावा असं वाटतं. त्याच्या कुरळ्या केसांपासून गुबगुबीत गाल आणि पोटाच्या ठेवणीपर्यंत प्रचंड आकर्षक असं हे शिल्प आहे. बाळकृष्णाची कथाच बाहेरील खांबांवर चितारली आहे.




मंदिरात विष्णुच्या अनेक अवतारांच्या कथा अगदी सहज कळतील अशा कोरल्या आहेत, आणि विशेष म्हणजे, ऊन-पाऊस-वारा सोसूनही इतक्या शतकांनंतरही त्या पुसट झाल्या नाहीत. मंदिराच्या दुसऱ्या द्वारातून आत आल्यास डाव्या बाजूच्या भिंतीवर वराहमित्रांची कथा चितारली आहे. तीही विशेष पाहण्यासारखी आहे. तर मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवर अनेक ठिकाणी श्रीरामाची कथा वेगवेगळ्या वेळेची, वेगवेगळ्या पर्वाची कथा दाखवली आहे. अनेक ठिकाणी रामांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, रामायणातील अशी अनेक पात्रं कोरून त्यांना विशेष महत्व असल्याचं दाखवून दिलं आहे. काही ठिकाणी अगदी तळहाताहून लहान शिल्पचित्रे कोरली आहेत. त्यात श्रीरामांचीही आहेत. ही लहान, पण दागिन्यांसकट स्पष्ट दिसणारी चित्रे विलक्षण रेखीव आहेत.



इतकं आकर्षक मंदिर पंधराव्या शतकात दुसऱ्या देवरायने बांधलं असलं, तरी मुसलमानांनी त्यांच्या विकृत धर्माच्या प्रसारासाठी भग्न केलं. हे मंदिराच्या आवारात प्रवेश करताच, अभिमानाने जी मान वर जाते, ती कळसाच्या शिल्पांचा भग्न अवतार पाहून दुःखाने खाली येते. अतिशय विकृतपणे या शिल्पमूर्तींची विटंबना केलेली दिसते. शेजारीशेजारी असलेल्या शिल्पमूर्तींचे चेहरे तर लागोपाठ एका आघातात पाडलेले दिसतात. अत्यंत असहाय्य वाटतं ती शिल्पं पाहून. आणि शिल्पांकडून नजर काढून समोर मंदिराती गाभाऱ्याकडे लक्ष गेलं की त्यातील नसलेल्या देवाला एकदा तरी आठवल्याशिवाय राहत नाही. एकदा भग्न झाल्यावर पुन्हा या मंदिरात कधी देव बसलेलाच नाही. त्या बंद गाभाऱ्याला नमस्कार करून बाहेरील सगळी अनमोल चित्रे पाहायचं भाग्य मिळालं यात आनंद मानायचा, इतकंच.



Saturday 7 April 2018

प्रश्नांमागचा Propaganda


आज सकाळी ट्रेनने दादरला जात होते. सारं काही नेहमीचं. धावपळ, गोंधळ. ट्रेनसाठी कटकट, ट्रेनची कटकट, ट्रेनमधली कटकट. आवाज, आवाज, नुसते आवाज. सोबतीचेच झालेत ते आता. नसले की उलट चुकल्यागत वाटतं. सगळ्या आवाजात घाटकोपर गेलं तेव्हा काही वेगळं ऐकू आलं. मागूनच ऐकू येत होतं. पण आपण नुसतं ऐकायचं. ट्रेनमध्ये गर्दीतले चेहरे तसेही विरून जातात. म्हणून बघायचे कष्टही घेतले नाहीत. ऐकू येत होतं.

काय रे, एकटाच आहेस? सोबत कोण आहे?”
कौन है तेरे साथ? मम्मी बैठी है अंदर?”
अकेला है? किधर से चढा?”
उल्हासनगर से door पे ही है?”
कहा जा रहा है?”
वापी? गुजरात?”
वहा पे कौन है?”
मम्मी है?”
तो उल्हासनगर मे किसके साथ रहता है?”
मौसी को पता है तू अकेला ट्रेन मे जा रहा है?”
मौसी नही आयी छोडने को?”
स्कूल जाता है?”
अकेला कैसे जायेगा गुजरात में?”
दादर में पापा है?”
पापा रुके है? वो लेके जायेंगे? ठीक है|”
पापा के साथ ही जाना हा, ऐसे अकेले कभी जाना नही|”

आवाजांच्या बदलत्या माहितीने माझ्या भावनाही बदलत होत्या. एकटा, 10-12 वर्षांचा जीव, एवढ्या गर्दीत रिकाम्या मनात निरर्थक प्रश्न सोसत होतं. पण हे संपणार आहे. काही वेळाने दादर येईल. तो पप्पांना भेटेल. आईकडे जाईल. मित्रांना भेटेल. मन बालपणात शिरतं न शिरतं तोच आवाज पून्हा वर्तमानात घेऊन आला.

नाम क्या है तेरा?”
आं? मुसलमान है?”
तभी ऐसा अकेला भटक रहा है| और तेरी मौसी को, पापा को, किसी को फिकीर नही है| तेरे धर्म में ना सब ऐसे ही है|”

बालपणात गेलेलं, मोकळं, अंहं, रिकामं मन, पुन्हा जहरभरल्या वर्तमानात आणल्याचा पश्चाताप झाला. डोक्यात सणक गेली. याआधी मागे पाहिलं नव्हतं. आता पाहायची ईच्छा उरली नाही. तरी आवाज येतच होते, आणि बधिर करतच होते.

गुजरात के मुसलमान हो?”
पंजाबी हो?”
“Non-veg खाते हो?”
तुम्हारा भगवान कौन है?”
वो वाहेगुरु? कि गुरु गोविंद सिंग?”
अरे रो क्यों रहा है?”
मम्मी की याद आ रही है?”
आठवण येत असेल हो...

आता सहन करणं शक्य नव्हतं. कोणीतरी हे थांबवणं गरजेचंच होतं. तसंही दादर येत होतंच. मी उठले आणि त्या आवाजाला काहीसं चिरडलंच.

अहो का त्या पोराला धर्मात अडकवतायत? स्वतः तर जाती-धर्माचा चोथा केलाय. का हा गोंधळ त्याला दाखवताय? कळलंय, बाप आहे त्याचा घ्यायला स्टेशनवर. जाईल त्याचा तो. देव बिव काय विचारायची गरज आहे का?”

हिला काय झालं मध्येच?”

मुसलमानाला मुसलमान नाहीतर अजून काय बोलणार?”

आम्हाला पण मराठे बोलतात ना. मराठेच आहोत आम्ही.

तुम्हाला बोलले का तुमचा धर्म किती गचाळ आहे? बोलले तर आत्ता ढकलून द्याल मला गाडीतून. त्या पोराला बोलताय. त्याला देवाचा अर्थही माहित नाहीये. आणि आईची आठवण ना तुमच्या या फालतू प्रश्नांनी येतेय त्याला. मुर्ख कुठचे.

तरी बरंच बोलायचं होतं. पण लोक खरंच मुर्ख असतात. बदलापूरला नीट चढायला मिळालं, बसायला ठाणे सीट मिळाली, दादरला नीट उतरायला मिळालं तेच पुरे होतं त्यांना.

गर्दीला चेहरे नसतात, पण मन असतं. एकंच नाही, अनेक. वेगवेगळ्या प्रकारचे मन. ते वळवायचं काम जेव्हा राज्य चालवणारे आणि ते चालवू पाहणारे करतात, तेव्हा ते अशाच गर्दीच्या मनांतून दिसतात. आपण कितीही म्हटलं, सोशल मिडिया लोकांवर तात्पुरता प्रभाव टाकते वगैरे. तरी तो प्रभाव हळूहळू वाढतही असतो, आणि खोलात जातही असतो. ही खोलात शिरण्याची प्रक्रिया बघायला मिळणं भयंकर आहे. इतके वर्ष पेरलेलं विष खोलवर पसरतंय, हेच दिसलं आज.

मागे भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर काढलेल्या मोर्चातला एका लहान मुलाचा व्हिडियो वायरल झालेला. त्याआधीही, मराठा मोर्चात लहान मुलांचे मोठे डोळे करून, भावनिकरित्या भडकवणारे फोटो वायरल झाले होते, घोषणा वायरल झाल्या होत्या. गोष्ट कोणतीही असो, ती लहान मुलांच्या रुपात आली की भीती वाटते. कारण, लहान मुलांचं मन रिकामं असतं. त्यात आपण जे भरू तशीच आणि त्याचीच प्रतिक्रिया ते देतात. त्यामुळे आपण विष पेरावं की आणखी काही, याचा विचार करावा. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे.

आपण म्हणू, What’s App वरचे forwarded message सगळ्यांना forward करणाऱ्या लोकांना काही कळत नाही. त्यांना कळत असतं खरं तर, म्हणूनच ते अचूक target बनतात. पाहिलं ते मान्य करणारी जानता म्हणूनच २०१४ मध्ये मोदीला निवडून आणते. आणि आता हीच जनता त्यांना किती वैतागलीय ते सतत निघणाऱ्या मोर्चांतून दिसत आहेच. समोर पाहिलेलं मान्य करणारा माणूस तर्क शोधू लागला तर काय होईल माहित नाही. पण तर्कहीन राहून, डोळ्यांना पट्टी लावून राहिलेल्यांमुळे देशात अराजकता माजेल हे नक्की.

वर्षानुवर्षे चालू असलेल्या propaganda मधून खोलात जाणारं brainwash आता अशा लहान मुलांच्या आणि ट्रेनमधल्या गर्दीच्या आवाजांतून ऐकू येतायंत. हे आवाज वाढण्याआधीच बंद करावे वाटतात. पण मानवतेला आता इथे जागा नाही. अंतराळाचीही नाही.

Saturday 24 March 2018

'नेट'चं जाळं


ते मल्लू अॅप्सचं वेड आणि त्यामुळे डेटा चोरी होण्याचं प्रकरण वगैरे निघालंय, त्याबद्दल काही लिहावंसं वाटलं. खरं तर याआधी अशा साईट्स आल्या होत्या. त्यांतून आपण आजवर मजा घेत होतोच. पण ते सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं इंग्रजीत होती. पण आता तीच गोष्ट, तो पॅटर्न मराठीत, तोही आकर्षक अशा गावठण भाषेत आल्यावर कोणीही आकर्षित होईल. पण कोणाला आठवतंय का, ह्या अॅपमधून सुरुवातील खूप मजेशीर प्रश्न आणि त्यांची मजेशीर उत्तरं मिळत होती. जसं की, तुमचं लग्न कधी होणार? तर त्यावर तू सिंगलच मरणार भावड्या, आणि मुलगी असेल तर कशाला कुणा बिचाऱ्याचं आयुष्य उध्वस्थ करायचं, तू रहा अशीचवगैरे विनोदी उत्तरं यायची. कसंय, आपल्या पिढीत सगळेच आपण कसे सिंगल आणि दुःखी आहोत हेच दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणून अशी उत्तरं आपण शेअर सुद्धा करतो. हे फक्त वरवर झालं. पण नंतर या अॅपवर तुमचा रोल मॉडेल कोण? अशा आशयाचे प्रश्न आले. त्यात बहुतेकदा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, असे, महाराष्ट्रात कोणीही शेअर करेल असे उत्तर होते. बरं त्यानंतर तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात काय करत होतात? किंवा शिवाजी महाराजांसाठी तुम्ही काय केलं असतं?असे प्रश्न येऊ लागले. त्यांची उत्तरंच अशी होती की कोणालाही अभिमान वाटेल, मित्रांमध्ये हूलाहूल करता येईल. त्यामुळे तेही भरपूर शेअर होऊ लागले. या रोल मॉडेल्सनंतर देव आले, तुम्ही कोणत्या देवाला मानता? यात श्रीकृष्ण, शंकर, ब्रम्ह, गौतम बुद्ध, गणपती होते. जो ज्या देवाला मानतो, तो त्याच देवाचं उत्तर शेअर करतो. ही फार सहज मानवी वृत्ती आहे. मला जे आवडतं, मी तेच लोकांना सांगते. त्यामुळे मला उत्तरात जे आलं आहे, मी तेच शेअर करीन असं नाही. मला माझ्या आवडीचं किंवा अपेक्षेप्रमाणे उत्तर आलं नाही, की मी बंद करते, किंवा रिफ्रेश करते, आणि जे हवं तेच शेअर करते.

यानंतर मध्यंतरी आणखी एक प्रश्न दिसला, महाराष्ट्रातील कोणती जात खतरनाक आहे? ज्याने ती पोस्ट शेअर केली होती, तो त्याच जातीशी संबंधित होता. कोणत्या वेगळ्या जातीचा असता, तर कदाचित त्याने त्या जातीचं उत्तर शेअर केलं असतं.
तर एवढं सगळं सांगायचा मुद्दा हा की तुमच्या उत्तरांचा डेटा जमा होतो, त्याचं विश्लेषण होतं, आणि तो डेटा विकला जातो.

तुम्ही काय लाईक करता, काय शेअर करता, कोणता व्हिडिओ जास्त वेळ पाहता, काय सर्च करता, कुठे क्लिक करता ते सगळंच Google, YouTube, Facebook वर स्टोअर केलं जातं. Google आणि YouTube हा डेटा त्यांच्या अॅड्स साठी वापरतात. म्हणून त्यांत keywords असतात, लेबल असतात, टॅग्स असतात. त्यावरून आपण सर्च केलेल्या, पाहिलेल्या व्हिडिओच्या keywords नुसार इतर व्हिडिओ आपल्याला recommend होतात. आणि तशाच अॅड्स सुद्धा दिसतात. फेसबुकवर सुद्धा आतापर्यंत हेच होत होतं, आताही होतंय. पण लक्षात घ्यावं लागेल की मल्लू अॅप फेसबुकचं नाहीये. ते कुणी दुसर्यांनी बनवलंय, आणि त्याच्या लिंक्स तेवढ्या आपल्याला मिळतात. हे असले अॅप किंवा वेबसाईट बनवणं काही महाग नाही. त्यावर अॅड्स दिसतात. त्या अॅड्स मधून फेसबुक आणि त्यांचे मालकही खूप कमवतात.

पण आता प्रश्न हा येतो की हे अॅप बनवलं कोणी? त्याचा डेटा कोणाकडे जातो? तो कोण विकत घेतो? हे अॅप पूर्वी फक्त इंग्रजी, हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेत होतं. आताच मराठीत कसं आलं? बरं बनवलं, मजा करू दिली, आपण केली, करतोय. मग ते अॅप देव, धर्म आणि जातीचे प्रश्न का विचारतायत? राजकीय प्रश्न का विचारतायत? हे कोणतं वर्ष चालुय? पुढच्या वर्षी काय आहे?
या प्रश्नांची उत्तरं मिळाली की नक्की शेअर करा हे सुद्धा.

Sunday 18 February 2018

शिवपर्वाचा उदय



अवघ्या आसमंतात जेव्हा परकीय अन्यायाचे ढग जमले होते, तेव्हा अचानक निसर्गाने आपल्या मुक्त रंगांची उधळण केली. त्यांत रंग होते सुखाचे, समृद्धीचे अन् स्वातंत्र्याचे. निसर्ग रणसंग्रामासाठी सज्ज झाला. ढगांनी नगाडे वाजवले. कड्याकड्यांवरच्या धबधब्यांनी ताशांचा ठेका धरला. वाऱ्याने तुतारीची नाद दिला. ताऱ्यांनी आकाशमंडल सजवले. सुखाच्या दिवसांची नांदी खुद्द निसर्गदेवतेने करून दिली. तो दिवस होता सह्याद्रीच्या पोटात नवसंजीवनी रुजण्याचा. तो दिवस होता अंधाऱ्या शतकात सूर्याचा अंश दीपवण्याचा. त्या दिवसाला उपमा शक्य नाही. त्या क्षणाचे वर्णन शक्य नाही. वर्षानुवर्षे परकीय राजवटींचा अन्याय सहन करणारा प्रत्येक क्षण आज शिवनेरी भोवती घिरट्या घालत होता, वाट पाहत होता त्या एका शुभ क्षणाची. तो शुभ क्षण जन्म घेत होता, जिजाबाईसाहेबांच्या पोटी. तो क्षण जो सूर्याच्या उत्तरायणात यावा अन् अवघा कौस्तुभाचा व्हावा. तो शुभ क्षण, जो यायला कित्येक वर्षे लागली. तो क्षण फाल्गुन मासातील वद्य तृतीयेचा. तो क्षण शुक्ल संवत्सराच्या महिमेचा. तो शुभ क्षण आला.. संवत्सर जनलोकात आले.. आऊसाहेबांच्या उदरी शिवबा जन्मले...

फाल्गुन वद्य तृतीयेच्या संध्याकाळी, सूर्य अस्ताला गेलेला... अन् तेव्हाच शिवबांच्या रुपाने नवसुर्याचा उदय झाला. नवपर्वाचा उदय झाला. अस्मानी संकटांशी झुंझण्यासाठी तेजोमय शिवपर्वाचा उदय झाला.