Sunday 4 October 2015

यादों का सफर

     काही दिवसांपूर्वी शाळेतल्या एका मित्राशी बोलत होते.  बोलत होते म्हणजे आजकालचं Digital Talk (चॅटींग हो!).  दहावीत आमचा वर्ग एवढा बेशिस्त(?) होता की टिचरांना एक मुलगा-एक मुलगी असं शिक्षा(?) म्हणून बसवावं लागलं होतं.  तर हा निखिल माझ्या बाजुला बसायचा.  निखिल आणि मी म्हणजे "मोटु और पतलु की जोडी" (याचा अर्थ तर तुम्हाला कळालाच असेल).  या जोडीसारखीच आम्ही खुप गप्पा मारायचो.  आणि दहावी म्हटलं तर आमचं वय असावं जेमतेम 15-16 वर्ष.  या कोवळ्या वयात जे काही घडतं, जेवढे काही मित्र बनतात, ते नेहमीच लक्षात राहतात.  म्हणुनच त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा मला नेहमीच लक्षात राहिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही अजूनही खुप चांगले मित्र आहोत.
     तर बोलता बोलता निखिल म्हणाला,
     "खुप दिवसांपासुन एक विचारायचं होतं.  विचारु का?"
म्हटलं विचार.
     "तु मला अजुन सांगितलं नाहीस, तु त्या दिवशी का रडत होतीस? तुला आता आठवत असेल की नाही माहीत नाही."
     आइंSSSग...  मला खुप हसु आलं.  कारणही तसंच होतं ना.  काय झालेलं, आमचा कॅम्प जाणार होता आणि सगळे जण Mobile Phones आणणार होते फोटो काढायला.  तर मीही ताईकडे मागत होते Mobile.  पण तिने सरळ "नाही"ची पाटी घेऊन तोंडासमोर ठेवली.  आईला सुद्धा पटवायचा प्रयत्न केला, पण त्यानेही काही झालं नाही.  मग सकाळ सकाळ वाद घालून तशीच शाळेत गेले आणि रडत बसले आणि ते फक्त निखिललाच कळालं, कारण मधल्या सुट्टीपर्यंत वातावरण नॅार्मल झालंही होतं.  किती बालिश होते मी.  एका फोनसाठी एवढं रडले.  हो अन् मग "कॅम्पला Mobile Phone आणायचा नाही.  जप्त केला जाईल!" अशी सूचनाही नंतर आलीच म्हणा.  पण तेव्हा Mobile च्या त्या fascination मुळे बरंच वाईट वाटून घेतलं होतं मी.
     आणि अजुन एक सांगायची गोष्ट म्हणजे, निखिलला अजुनही हे आठवतंय.  वा!  मला तर त्याने आठवण करून दिली तेव्हा आठवलं.  आणि दुसरं म्हणजे त्याला अजुनही आधी एवढीच Curiosity आहे, की "लोक असं का करतायंत" हे जाणून घ्यायची.  मस्तच.  नाहीतर मला "लोकांना काय करायचंय ते करुदे" हे म्हणण्या इतपत सगळ्याचा वैताग आलाय.
     अचानक समोर आलेला तो किस्सा पहिले तर खुप हसायला लावतो, पण विचार केला तर तेव्हाच्या त्या परिस्थितीची जाणीवही करुन देतो.  आणि आजच्या परिस्थितीला जोडून पाहिलं तर ते क्षण आपल्यासाठी किती महत्वाचे होते हेही तेव्हाच कळतं. कारण त्यातून  आपल्याला अनुभव मिळालेला असतो.  आणि खरं सांगायचं झालं तर अनुभवातूनच आपण खरे शिकतो.  माझ्यासाठी तर ट्रेनमध्ये टी.सी.ने Without Ticket पकडलं तोही खतरनाक अनुभव होता.  यातून सर्वात चांगला एक बदल झाला तो म्हणजे आता मी कधीच Without Ticket प्रवास करत नाही आणि दुसरं म्हणजे मी किती छान Acting करू शकते आणि किती चांगल्या गोष्टी On The Spot बनवू शकते हेही कळालं.  कदाचित म्हणूनच आता BMM करतेय मी.  पण खरंच यादों का एक सफर करना तो बनता है,  क्योंकी यादों का ये सफर बडा सुहाना है.

No comments:

Post a Comment