Monday 7 August 2017

राखी

     दरवर्षीसारखी आजची राखीपौर्णिमा जराशी वेगळी होती. यावेळी ती आईसोबत राखी आणायला बाजारात गेली नव्हती. बहिणींसोबत गेलं की आपल्याला नेहमीच सगळ्यात वाईट राखी मिळते असं तिला वाटायचं. तसं होतंही. बहिणी आपापल्या आवडीच्या राख्या उचलायच्या. आणि आई घेईल ती राखी तिला बांधायला लागायची. म्हणून यावर्षी तिने ठरवलं, आपणच राखी घ्यायची. यंदाच मोठ्या कॉलेजात जायला लागल्याने कॉलेजचा आणि त्या परिसराचा टेंभाही मिरवायचा होताच. म्हणून तिने कॉलेजजवळच्या बाजारात जाऊन सुंदर राखी खरेदी केली. आवडता रंग, त्यावर खोट्याच सही, पण मोत्यांची सजावट, लोकरीतच केलेली नक्षी... प्रवासासाठी मिळालेल्या पैशांत तिने ती राखी खरेदी केली. पहिल्यांदाच आपल्या आवडीची राखी मिळाल्याने तिला धावत्या ट्रेनमध्येही आभाळात गेल्यासारखं वाटत होतं. बॅग उघडून सतत नजरेत ठेवत होती तिला.., मग भावाला ती बांधल्यावर काय करणार होती कुणास ठाऊक.

     सकाळ झाली. तिने गणपतीत घालायला घेतलेला पंजाबी ड्रेस आजच घातला. त्यावर आईचा आणि बहिणीचा ओरडाही नाश्ट्यासकट खाल्ला. बहिणींनी पाटाभोवती रांगोळी काढून, ओवाळणीचं ताट सजवून घरपण आणलं. दादाही नवीन कपडे घालून तयार झाला. पाटावर बसल्यावर आई, बाबा, बहिणी, सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. ती सर्वांत लहान म्हणून तिचा ओवाळणीचा नंबरही नेहमीप्रमाणे शेवटचाच. मोठ्या बहिणीने ओवाळलं, राखी बांघली, पेढा खाऊ घातला, दादा पाया पडला. दुसरीने ओवाळलं, राखी बांघली, आणि पेढा खात खात दादा पाटावरून उठून, 'झालं' म्हणून निघून गेला. ती बघतच राहिली. खुप प्रश्न होते डोळ्यांत. पण ओठांतून शब्द फुटले नाहीत. फुटणारही नव्हते. काय विचारणार होती ती? एका पुरुषावर प्रेम केलं म्हणून दुसरा पुरुष राखी न बांधता निघून का जातो, हे विचारणार होती? कि, एका पुरुषाच्या राखीसाठी दुसर्‍या पुरुषाचं प्रेम का त्यगावं, हे विचारणार होती? तिच्या आयुष्यात तीनच पुरुष होते. दादा, बाबा आणि मित्र. त्यातले दोन आता वजा झाले होते. ती तिघांशीही प्रमाणिक होती. परिस्थीती तेवढी कपटाने वागली.

     त्या दोन पुरुषांसारखंच व्यक्तिमत्व, त्यांचा रुबाब, स्वाभिमान, बंडखोर वृत्ती घेऊन तिने तिसर्‍यावर प्रेम केलं. त्या दोघांच्या वृत्तीहून एकच काय ती वेगळी गोष्ट केली होती तिने. मित्रावर प्रेम. त्याला मग स्वाभिमान आणि बंडखोरीची जोड लाभली. ना आर्जव केला, ना प्रतारणा. ते स्वभावात बसतच नव्हतं कुणाच्याच. ती वाहत होती, तशीच वाहत गेली. पण प्रवाह तिचा तिने ठरवलेला... आता दरवर्षी तिला आठवते ती राखी. तिच्या आवडीने घेतलेली. पण कोणत्याच हातावर न बांधलेली. म्हटलं तर कमनशिबी, म्हटलं तर सर्वांत सुखी. निदान तिच्या आयुष्यात तरी दोन जीवांना बंधनात, एकमेकांच्या रक्षणार्थ वगैरे अडकवण्याचा त्रास नाही आला.

No comments:

Post a Comment