Friday 25 August 2017

डायरीतल्या गोष्टी #4

चाळीत असताना गणपती आजी-आजोबांकडे असायचा. अनंत चतुर्दशी पर्यंत. खुप लहान होते तेव्हा. त्यामुळे आठवणी फार पुसटशा आहेत. दहा दिवस चालणारे कार्यक्रम खुप आवडायचे. आरती, पाहुणे, मस्त जेवण... पत्ते खेळता येत नव्हते, कारण अर्थात कच्चा लिंबूच होते. पण भावांना फक्त पत्ते खेळताना पाहण्यासाठी मीही रात्री जागवल्याचं आठवतंय. त्रयोदशीचा कार्यक्रम तर भलताच आवडीचा होता. दुपारी कसली तरी पूजा असायची, त्यामुळे पाहुणे नेहमीपेक्षा जास्तच. संध्याकाळी बायकापोरी नऊवारी साडी नेसून, पोरं टोपी-रुमाल बांधून आत्याने शिकवलेल्या गाण्यांवर नाचायचो. मी फारच लहान असल्याने माझ्या मापाची नऊवारी तेव्हा मिळाली नसावी कदाचित. म्हणून मलाही रुमाल बांधून, टीशर्ट घालून, मिशी रंगवेलेली. एकदाच मला मी नऊवारी नेसल्याचं आठवतंय त्या कार्यक्रमात. भारी असायचा तो दिवस. आम्हाला तसंही नाचायची संधीच हवी असायची. सगळी आगरी गाणी आणि त्यांच्या स्टेप्स तोंडपाठ. पण सगळ्यांचं आवडतं गाणं 'गण बाय मोगरा'.. अगदी loop वर असायचं ते गाणं. आजीच्या घरासमोरच्या मिळेल त्या जागेत गोल करून त्या आवडत्या 'गण बाय मोगरा'च्या स्टेपवर थकेपर्यंत नाचायचो. त्यात आजीचा सहभाग आजही विशेष असतो. एवढं काय ते माझं मला आठवतंय. पण मागे एक भारी गोष्ट बहिणीने सांगितली. गणपतीच्या मखराची सजावट म्हणजे वेगळीच होती आमची. कुटूंबच तसं जुगाडू म्हणून ओळखलं जातं, त्यामुळेच असावं कदाचित. तर गणपतीच्या समोर तिन्ही बाजुला समुद्रावरची वाळू आणून पसरवत. अन् त्यात गणपती बसायच्या आधी मेथी पेरत. अनंत चतुर्दशीपर्यंत त्यात मेथी उगवायची सुद्धा. मग त्या दिवशी त्याच मेथीची भाजी असायची ताटात. किती भारीय हे... आता थर्मोकॉल आणि प्लॅस्टिकच्या वेलींची वगैरे सजावट होते. पण बाप्पाच्या पुढ्यात उगवलेल्या भाजीची चव निराळीच. अक्कल नसताना का असेना, मी ती चव घेतली हेच खुप आहे माझ्यासाठी.

No comments:

Post a Comment